ठाणे - कल्याण पूर्व भागातील तिसगाव येथील 60 फुटी रस्त्यावरील कचरा कुंडीत एक दिवसाचे जिवंत नवजात अर्भक टाकून अज्ञात व्यक्ती पसार झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेकडील तिसगाव रोड परिसरातील यशवंत हाईट्स इमारतीच्या पाठीमागे नाल्याचे काम करीत असताना काल दुपारच्या सुमारास एका मजूराला कचरा कुंडीत ओढणीत बांधलेल्या अवस्थेत अर्भक दिसले. या मजुराने लागलीच मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना माहिती दिली. या अर्भकाच्या जीवास धोका निर्माण होण्यापूर्वीच मनसैनिकांनी धावपळ करून नवजात अर्भकाचे प्राण वाचवले.
मनसे सैनिकांमुळे वाचले नवजात अर्भकाचे प्राण -
समाजसेविका योगिता गायकवाड, मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे, मनसेच्या जिल्हाध्यक्ष स्वाती कदम व जिल्हा सचिव वासंती जाधव यांनी बाळाला घेऊन लागलीच रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेऊन नवजात अर्भक मिळाल्याची खबर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली. विशेष म्हणजे, अर्भकाचे प्राण वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयाचा बेशिस्त कारभार अनुभवास मिळाला. त्यानंतर सिंडिकेट येथील मेट्रो रुग्णालयात अर्भकाला दाखल करण्यात आले. बाळाची आक्सिजन क्षमता फार कमी झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. अजून थोडा उशीर झाला असता तर विपरीत घडले असते, असेही डॉक्टर म्हणाले.
कचराकुंडीत आढळलेल्या बाळाचं नाव ठेवलं ‘राज'
कचराकुंडीत आढळलेल्या बाळाचे प्राण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचवल्याने त्याचे नाव राज असे ठेवण्यात आले आहे. निर्दयी माता-पित्याचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेने केली. कल्याणमधील खाडीत दोन चिमुरड्यांना मरणाच्या दारात टाकून गेलेल्या निर्दयी मातेचा चार दिवस उलटूनही शोध लागला नसतानाच अशाच प्रकाराची घटना पुन्हा समोर आली आहे. या दोन्ही घटनेमधील बालकांना मात्र मायेच्या ओलाव्याला मुकावे लागले आहे.
हेही वाचा - नाशिक - बेपत्ता तरुणीचा तिच्याच गाडीत आढळला मृतदेह