ठाणे - जिल्ह्यातील सर्वात मोठी देहव्यापार करणाऱ्या भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांनी कोरोना काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून व्यवसाय बंद केला होता. त्यामुळे त्या कालावधीमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. मात्र, एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने त्यांना कोविड काळात अन्नधान्य उपलब्ध करून दिले. राज्य शासनानेही या महिलांसाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बहुतांश महिला शासनाच्या अर्थसहाय्यपासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. (Prostitutes deprived of government funding) विशेष म्हणजे कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीत एकही देहविक्री करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली नसल्याचीही बाब समोर आली आहे. (no prostitute found corona positive)
यातनादायी जीवन जगतानाच कोरोनाचे संकट -
देहव्यापाराच्या अंधकारमय यातनादायी जीवन जगताना कोरोना संकटात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देहविक्रीचा व्यवसाय कोरोनाच्या भीतीने बंद करण्यात आला. त्यानंतर जगायचे कसे? असा प्रश्न या महिलांना पडला होता. मात्र, श्री साई सेवा संस्थेच्या (shri sai seva organization) माध्यमातून जवळपास ५०० वारांगनांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. यानंतर त्यांच्यात नव्या उमेदीने पुन्हा जीवन जगायची आशा निर्माण झाली. तर दुसरीकडे देहविक्री करणाऱ्या महिलांना दरमहा ५ हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात, अशा महिलांना अतिरिक्त २ हजार ५०० रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता वितरित करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आला. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या ३ महिन्याच्या कालावधीसाठी ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५००रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र, भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील ५०० हुन अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांना केवळ एकच महिन्याचे अर्थसहाय्य मिळाले. तर काही महिला आजही शासनाच्या अर्थसहाय्यपासून वंचित आहेत. त्यामुळे सरकराने आमच्याकडेही लक्ष देऊन आम्हाला आर्थिक मदतीसह आमच्या आरोग्याचा प्रश्न सोडावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी देहव्यापार बंद करण्याचा निर्णय -
भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील ५०० हुन अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मदत झाली आहे. श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती सिंग-खान यांनी चार वर्षांपूर्वी सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या महिलांशी या काळात स्वाती खान यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले. त्यातच मार्च महिन्यात देशभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात असंख्य उद्योग व्यवसाय बंद असतानाच स्वाती खान यांच्या नेतृत्त्वाखाली येथील महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळावा यासाठी आपले रोजगार असलेला देहव्यापार व्यवसायदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - नागपुरात उच्चभ्रू वसाहतीत सुरू होता देहव्यापार, पोलिसांनी तीन महिलांची केली सुटका
लॉकडाऊन काळात स्वावलंबनाचे धडे -
लॉकडाऊन काळात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजसेवी संस्थांनी या महिलांसाठी धान्य किराणा, साहित्य आजपर्यंत पुरविले. मात्र, त्यांच्या पोटाची भूक भागवून स्वस्थ न बसता स्वाती खान यांनी या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी येथील २५ महिलांना अगरबत्ती पॅकिंग, दिवाळी शोभेची लायटिंग बनविणे, या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. हळूहळू या कामातून पैसे मिळायला लागल्याने या महिलांनी देहव्यापार बंद करून सर्वसामान्य महिलांचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वाती खान यांनी या परिसरातील चार खोल्या भाड्याने घेऊन त्यास रंगरंगोटी करून नव्या स्वरूपातील घर या महिलांच्या ताब्यात दिले.
आरोग्य व समस्यांचे कायम स्वरूपी निवारण करणे गरजेचे -
या महिलांचे समुपदेशन करुन त्यांचा निर्धार ठाम आहे का? याची खूणगाठ बांधून या महिलांच्या घरांची व्यवस्था करताना त्यांना पैशांसाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही, असा रोजगार त्यांना उपलब्ध करून देत या महिलांसाठी 'चिची हाऊस'ची संकल्पना श्री. साई सेवा संस्थेच्या वतीने राबविण्यात आली आहे. या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याने मनाला आत्मिक समाधान मिळाले आहे. मात्र, सरकारने अशा महिलांचे आरोग्य व त्यांच्याही समस्यांचे कायम स्वरूपी निवारण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया श्री. साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती सिंग-खान यांनी दिली.