ठाणे - रस्ते दुरुस्तीसाठी १ सप्टेंबरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर श्राद्ध आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात मुंडनही केले होते. शिवाय याच दिवशी गणेशोत्सवापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा टोल वसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र गणेश विसर्जन होऊनही रस्ते जैसे थे होते. त्यामुळे आज मनसैनिकांनी खळ्ळखट्ट्याक स्टाईलने आंदोलन करत भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी टोल नाका फोडला आहे. तर टोलनाक्यावर गस्तीवर असलेल्या नारपोली पोलिसांनी यावेळी टोलनाका फोडल्याप्रकरणी काही मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
भिवंडी-ठाणे महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही २० ऑगष्टला मनसे कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यातील वसई मार्गावरील खारबाव-कामण रस्त्यावरील मालोडी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यांनतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही खड्डे जैसे थे असल्याने १ सप्टेंबर रोजी कशेळी टोल नाक्यावरच मनसेने प्रशासनाचे श्राद्ध घालून मुंडन आंदोलन केले आणि टोल केला बंद केला होता. तसेच त्यावेळी रस्त दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.
ठाणे-भिवंडी मार्ग बीओटी तत्वावर तयार करण्यात येऊन या मार्गवरील कशेळी गावाच्या हद्दीत टोल नाका उभारून याठिकाणी वसुली सुरु केली. मात्र रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. अंजुर फाटा ते कशेळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो आहे. अनेकांना मानेचा, कंबरेचा, पाठीच्या आजाराला देखील समोरे जावे लागत आहे. तसेच अनेकदा अपघात घडून काही जणांना जखमी तर काहींना जीव गमवावा लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केले जाते? असा सवाल मनसेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे कशेळी टोल नाका ते अंजुर फाटा रस्ता गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती.
हेही वाचा - जनआशीर्वाद यात्रा, मारामारी चालते; फक्त सणांमधूनच कोरोना पसरतो का? - राज ठाकरे
हेही वाचा - किरीट सोमय्यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार