ठाणे - पावसाचे आगमन होताच केवळ एक ते दीड तास पावसाने धुमाकूळ घातल्याने भिवंडी शहरातील काही सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला आहे. तर अनेक सखल भागातील दुकांनासह रस्त्यावर पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसाने नालेसफाईची पोलखोल -
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात आज सकाळपासून हवामानात बदल होऊन दुपारच्या सुमारास तास दीड तास मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडीत मुख्य रस्ता असलेल्या कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करत वाहतूक कोंडी फोडावी लागली. तसेच शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच मुसळधार पावसाने नाले सफाईची पोलखोल केली आहे.
वाहतूक व्यवस्था कोलमडली -
शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल, नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागात शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
हेही वाचा - अपरा एकादशी 2021: जाणून घ्या जल क्रीडा एकादशीचे शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व