ठाणे - मुंब्रा परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अहमदनगर येथे फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अहमदनगर येथून अटक केली. ही घटना २९ नोव्हेंबर, २०२० रोजी घडली होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेल्या गुन्ह्याच्या शोधकामासाठी मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाद्वारे समांतर तपास सुरू होता.
हेही वाचा - शहरी-ग्रामीण भागात इंटरनेटची मोठी दरी
अपहरणाचा आरोपी सागर शेंडेफळ मगर ( वय २५ रा. दिवा पूर्व) यानेच मुलीला पळविले होते. आरोपी स्वतः अस्तित्व लपवून राहत होता. त्याने अपहरण केलेल्या मुलीला शेगाव (जि.अहमदनगर) येथे ठेवले होते. अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून युनिट-१ चे पथक २० जानेवारी २०२१ रोजी अहमदनगर येथे रवाना झाले. पोलीस पथकाने शोध घेतला तेव्हा आरोपी हा शेगाव येथील कुणाल हॉटेलमध्ये असल्याचे समजले. दरम्यान, पोलिसांनी छापा मारून सागर मगर (वय २५ रा. दिवा, मुळचा बुलडाणा) याला अटक केली. पुढील तपासासाठी आरोपी मगर याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
एका आठवड्यामधे 3 कारवाई
ठाणे गुन्हे शाखेने एका आठवड्यात तीन कारवाया करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली, तर दुसऱ्या गुन्ह्यात साडे चार लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या तपासात आतापर्यंत सीडीआर घोटाळा, पेट्रोल पंप चिप घोटाळा, हजारो कोटी रुपयांचे एफेड्रिन हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
हेही वाचा - 'अर्णब गोस्वामीच्या लीक चॅटची सखोल चौकशी व्हावी'