ठाणे - महाराष्ट्र शासनाने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2020 पक्षी सप्ताह जाहीर केला आहे. त्यानुसार भिवंडी तालुक्यातील तब्बल दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वनाधिकारी प्रत्येक गावो-गावी जाऊन ग्रामस्थांना एकत्र करून जंगल आणि पक्षी वाचवण्याचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पक्षी आणि जंगल वाचवण्यासाठी आता गावकरी पक्षी सप्ताहातून पुढाकार घेताना पाहावयास मिळत आहेत.
भिवंडी तालुक्यातील दाभाड, आदिवासी पाडा, पहारे, आवळे, विश्वगड, कुशिवली, गोंड पाडा, राऊत पाडा, खंबाला, जावईपाडासह बहुसंख्य गाव आणि पाड्यात वनाधिकारी साहेबराव खरे हे जाऊन गावातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, समाजसेवक, महिला आणि नागरिकांना एकत्र घेऊन त्यांना जंगलाचे रक्षण कसे करायचे, वणवा कसा टाळायचा, पशु-पक्षांचे रक्षण कसे करायचे, याची सविस्तर माहिती देत आहेत. त्याचप्रमाणे जंगलात नेऊन वनाधिकारी खरे हे झाडांची माहिती, पक्षांची घरटी, पक्षांची माहिती देऊन वन्यजीव कायदा आणि पक्षी संवर्धन या विषयी जनजागृती करीत आहे.
ओसाड डोंगरावर अकरा हजार झाडे लावली
यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वनाधिकारी साहेबराव खरे यांनी आवळे, विश्वगड आणि पहारे परिसरातील ओसाड झालेल्या डोंगरावर अकरा हजार झाडे लावून आज हे डोंगर हिरवाईने नटले आहेत. वृक्ष प्रेमी आणि पर्यावरण प्रेमी दाभाड येथील अमोल भोईर यांनी वनविभागाकडे जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पशु-पक्षांच्या निवाऱ्यासाठी एक लोखंडी पिंजरा वनपाल किरवली यांचेकडे सुपूर्द केला. तर शांताराम पाटील, सरपंच अनंता पाटील, प्रमोद सुतार, दिपक भोईर, प्रल्हाद पाटील, अंकुश पाटील, प्रगतशील शेती पुरस्कारप्राप्त विजय पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, कुणाल पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
तर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी साहेबराव खरे यांच्यासह वनरक्षक प्रमोद सुतार, विष्णू आसवले या तिघांवरच जगले वाचविण्याची भिस्त असून त्यांच्या प्रयत्नामुळेच जंगल आणि पशु-पक्षी वाचवण्यास नक्कीच यश मिळणार असल्याचे दिसून येत आहे.