ठाणे - जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी मान्सूनच्या पावसाचे आगमन लांब चालले असल्याने बळीराजाची काळजी वाढत चालली होती. त्यातच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुकबल पाऊस पडणार या आशेने शेतकऱ्यांनी रोपांची पेरणी सुरू केली होती. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारपासून दमदार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
सन २०१९ साठी जिल्ह्यातील ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर १ लाख ५७ हजार ९४९ मेट्रिक टन उत्पादनाचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. या हंगामासाठी प्रामुख्याने भात पिकांसाठी ९८ हजार २८० क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून २ हजार ५७८ किलो प्रति हेक्टर उत्पादकाचे लक्षांक निश्चित केला आहे. यासाठी जिल्ह्याला १० हजार ६७० क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर १४ हजार २८० मेट्रिक टन खतांचे आवंटन प्राप्त झाले असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
याशिवाय २,२६० क्षेत्रावर नागली पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. तर १ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, ८८० हेक्टरवर उडीद, १९० हेक्टरवर मूग, १ हजार ३२० हेक्टरवर तूर, २३७ हेक्टरवर गळीत धान्य पिके, ५३३ हेक्टरवर इतर कडधान्य असे पेरणीचे नियोजन करण्यात आले. मागील वर्षी खरीप हंगामात प्रत्यक्षात ५८ हजार ८६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असेल असे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खुश होता. मात्र, पावसाचे आगमन लांबत गेल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती.
जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान सरासरी अंदाजे १७ हजार १५० मिमी पाऊस पडत असतो. त्यातही जून महिन्यात अंदाजे ३ हजार १८८ मिमी पावसाची नोंद होत असते. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत ठाणे जिल्ह्यात फक्त ८८५.७० मिमी पाऊस पडला. त्यात कल्याण तालुक्यात १२५ मिमी तर मुरबाड तालुक्यात ६१ मिमी तसेच शहापूर तालुक्यात अवधा ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच काळात जिह्यात ३ हजार ८४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यावर रुसलेला वरुणराजा गुरुवारपासून जोरदार बरसत आहे. भात पीकाची लावणी करण्यात आली असून बऱ्याच ठिकाणी रोपांना बाळसंही धरले आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून रोपांची लावणी करण्यास सुरुवात करावी लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.