ठाणे - भिवंडी तालुक्यात केमिकल डाईंग व सायजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक वेळा या कंपनीच्या मालकांकडून शासकीय नियमाची पायमल्ली होताना दिसते. मात्र, शासकीय अधिकारी व स्थानिक नेते पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे या कंपन्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शहरातील विशेषता ग्रामीण भागात असलेल्या या कंपन्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर सोडण्याच्या प्रकार सुरूच -
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अंजुर फाटा ते वसई महामार्गावर असलेल्या कालवार येथील गणराज्य कंपन्या गोदाम संकुलनात असलेल्या वल्लभ आर्ट या डाईंग कंपनीच्या मालकाकडून शासकीय नियमाची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कंपनीतून निघणारे केमिकलयुक्त पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने रस्त्यावर हिरव्या रंगाचा थर पसरून केमिकलयुक्त पाणी साचत आहे. विशेष म्हणजे या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने येथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या विषयी डाईंग मालकाला अनेक वेळा समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही डाईंग मालकाकडून केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर सोडण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिक सुनील म्हात्रे यांनी दिली आहे.
चौकशी करून कारवाई होणार -
या केमिकल मिश्रित पाण्यासंदर्भात चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - ...म्हणून वाशी 'एपीएमसी'तील माथाडी कामगारांचे आंदोलन