ठाणे - साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी हुंड्याची मागणी करीत लग्नासाठी नकार दिल्याने हतबल झालेल्या तरुणीने वडिलांसह किन्हवली पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलीस निरीक्षक फेगडे व पोलीस हवालदार अगिवले यांनी तक्रार न घेता पोलीस ठाण्यातून हकलून लावले. असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्याविरोधात तिने कुटुंबासह पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांविरोधात आमरण उपोषण सुरू केले असून कारवाईची मागणी केली आहे.
शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कविता फर्डे या तरुणीचा मुरबाड तालुक्यातील नागांव येथील प्रविण हरड या तरुणासोबत १० फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता. मात्र, साखरपुडा झाल्यानंतर प्रवीणने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे पो.नि. अरुण फेगडे आणि व पोलीस हवालदार विलास आगिवले यांनी प्रवीणला पाठीशी घालून पीडीतेला न्याय देण्याचे सोडून उलट तरुणीला व तिच्या वडिलांना आतमध्ये टाकू, अशी धमकी दिली आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही पीडीत तरुणीने केला आहे.
दरम्यान, पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राठोड यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर पोलीस अधीक्षक यांनी प्रकरणाची दखल घेऊन शहापूर डीवायएसपी दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चैकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र, तब्बल एक महिना उलटूनही किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व त्यांचा लिपिक विलास आगीवले यांनी पीडितांना न्याय न देता केवळ त्यांचा मानसिक छळ करून धमकावल्याचा आरोप तरुणीने केला. तसेच आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने या दोघा पोलिसांवर कारवाईसाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी पीडीत मुलीने किन्हवली पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
विशेष म्हणजे किन्हवली पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या दोन महिन्यात साखरपुडा होऊन लग्न मोडल्याच्या साधारण ५ घटना घडल्या आहे. यामधील पीडितांना न्याय न मिळता केवळ त्यांच्यावरच अन्याय होत असून आरोपींना पाठीशी घालण्याचे प्रकार किन्हवली पोलीस ठाण्यात घडत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.