ठाणे - कोरोनाच्या काळात भरमसाट वीजबिल पाठवून ती न भरल्यास विजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा देणाऱ्या महावितरणविरोधात आज ठाण्यामध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ठाणे भाजप उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी थेट वागळे इस्टेट येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देऊन, वीज बंद केली. तसेच वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सर्व सामांन्यांवर काय परिस्थिती ओढावते याची जाणीव करूण देण्यासाठी भाजपच्या वतीने मेनबत्त्या पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला.
भाजपकडून शासनाचा निषेध
कोरोना काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. लोकांकडे पैसे नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये नागरिक वीजबिल कसे भरणार असा सवाल भाजपच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे? राज्य सरकारने वाढीव वीजबिलाबाबत काहीतरी तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुका होताच पुन्हा एकदा वीजबिल वसुलीला सुरुवात झाली आहे. जे नागरिक बिल भरणार नाहीत त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल असा इशारा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. या विरोधात आज ठाण्यात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजपने आज थेट महावितरण कार्यालयात जावून वीजपुरवठा खंडीत केला. तसेच मेनबत्त्या पेटवून शासनाचा निषेध केला आहे.
वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक
मागील काही दिवसांपासून वाढीव वीजबिलाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करत वीज बिलांची होळी केली होती. तर आता देखील भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.