सोलापूर: होटगी रोड येथे विमानतळ सुरू करण्याच्या मागणीवरून चक्री उपोषणाला बसलेले उद्योजक केतन शहा यांना 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी सार्वजनिक ठिकाणी रिवॉल्व्हर दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. अद्यापही याबाबतचा गुन्हा दाखल झाला नाही. याप्रकरणी पोलिस आयुक्तालयाने काडादींना नोटीस बजावली आहे. रिवॉल्व्हर स्वरक्षणार्थ असतानाही त्याचा गैरवापर केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. केतन शहा यांना याबाबत गुन्हा का दाखल केला नाही. पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद का दिली नाही, अशी माहिती विचारली असता, ते म्हणतात की पोलिसांनी स्वतःहुन गुन्हा दाखल करून कारवाई करावी.
रिव्हॉल्व्हर परवाना रद्द का करू नये अशी नोटीस: राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची गरज व मागणी पडताळून पोलिस व जिल्हाधिकारी प्रशासनाकडून रिवॉल्व्हरचा परवाना दिला जातो. त्याचा स्वत:च्या रक्षणासाठीच वापर करता येतो. गैरवापर केल्यास परवाना रद्द केला जातो. रिवॉल्व्हर देताना पोलिसांकडून अटी व शर्थी घालून दिल्या जातात. त्याचा भंग केल्यास संबंधिताला नोटीस बजावली जाते. त्यानंतर आठ-दहा दिवसांत पोलिस आयुक्तांना खुलासा देणे बंधनकारक आहे.
नोटीस बजावली: पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी धर्मराज काडादी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक ठिकाणी खिशातून रिवॉल्व्हर काढून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यासंबंधी खुलासा करावा. तुमच्याकडील रिवॉल्व्हरचा परवाना रद्द का करू नये, यासंबंधी नोटिशीतून विचारणा करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
उत्तर देण्यास टाळाटाळ: श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांनी मंगळवारी सायंकाळी माध्यमांना विमानतळ बाबत माहिती देण्यासाठी बोलावून घेतले होते.पहिलाच प्रश्न रिव्हॉल्व्हरचा विचारण्यात आला,त्यावेळी धर्मराज कडादी यांनी यावर नंतर बोलतो.अगोदर विमानतळ बाबत सविस्तर बोलतो,असे सांगून रिव्हॉल्व्हरच्या प्रश्नाला बगल दिली.
पोलिसांनी स्वतःहुन गुन्हा दाखल करावा: विमानतळ सुरू करावे यासाठी गेल्या वीस दिवसांपासून सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे.या उपोषणातील प्रमुख मागणी म्हणजे विमानतळाला अडथळा असणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी आहे,ती पाडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी उपोषण ठिकाणी येऊन, केतन शहा यांना धमकी देत रिव्हॉल्व्हर काढून दाखवले होते.
प्रतिबंधक कारवाई: गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. याचा व्हिडीओ देखील वायरल झाला होता. पण याबाबतचा गुन्हा दाखल झाला नाही, यावर केतन शहा यांना फिर्याद का दिली नाही असे विचारले असता, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यावर प्रतिबंधक कारवाई म्हणून नेहमी पोलीस कारवाई करत असतात. यावेळी पोलीस माझ्या तक्रारीची वाट का पाहत आहेत. त्यांनी स्वतःहुन गुन्हा दाखल करून कारवाई करावी.