सोलापूर - जिल्ह्यातील शिरपूर गावातील शेतकरी मोहन दत्तात्रय अदमाने या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मोहन अदमाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.
हेही वाचा - सातारा येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा सोलापुरात निषेध
मोटारसायकलवरून मोहोळवरून लांबोटीकडे येत असताना अदमाने यांच्या दुचाकीला आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी ओव्हरटेक करत पुढे गेली. पुढे असणाऱ्या कंटेनरला आरटीओ अधिकाऱ्यांनी गाडी आडवी लावल्यामुळे त्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मोहन आदमाने हे त्या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. मात्र, आरटीओ अधीकारी यांनी या आरोपाला फेटाळून लावले आहे.
चिडलेल्या ग्रामस्थांनी मृत्यूस कारणीभूत आरटीओ अधिकारी आहेत, असा आरोप करत, आरटीओ अधिकाऱ्यांचे वाहन फोडले. आणि त्यांना जबर मारहाण केली. यामुळे सोलापूर पुणे महामार्गावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर, मोहन अदमाने यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
आरटीओच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचा आरोप
अपघातात मोहन अदमाने यांचा जागीच मृत्यू झाला. आरटीओ अधिकाऱ्यांनी महामार्गावर वेगात असलेल्या कंटेनरला थांबविले नसते तर हा अपघात झाला नसता. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अपघात झाला, असा आरोप करत उपस्थित नागरिकांनी आरटीओ कार्यालयाच्या वाहनाची मोडतोड केली आहे. या अपघाताला तेच जबाबदार आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना जबर मारहाण -
सोलापूर पुणे महामार्गावर दोघा मोटार वाहन निरक्षकांना जमलेल्या जमावाने जबर मारहाण केली आहे. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक शिवाजी निवृत्त सोनटक्के यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली दगडाने मारहाण केली आहे. त्यात त्यांना सात टाके पडले आहे. तसेच, निरीक्षक राजेश आहुजा यांच्या गळ्या खाली जखम झाली असून जमावाने लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे. आरटीओ वाहन चालक शिवाजी किसन गायकवाड यांना जमावाने खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये जबर मुक्का मार लागला आहे. तिघा जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी विजय तिरानकर, निरीक्षक महेश रायबान, संदीप शिंदे, सागर पाटील यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.
मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू -
आरटीओ अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने मोहोळ पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. अपघातातील मृताचे नातेवाईक व त्यांसोबत असलेला जमाव हे देखील मोहोळ ठाण्यात येऊन गोंधळ सुरू केला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. तसेच, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कंटेनर चालक वाहनासह फरार -
या घटनेचा मुख्य साक्षीदार कंटेनर चालक हा आपले वाहन घेऊन फरार झाला आहे. ग्रामस्थांनी आरटीओ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. तर, आरटीओ अधिकारी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. या घटनेचा मुख्य साक्षीदार असलेला कंटेनर चालक फरार झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा - Road Accident in Solapur : दर्शनासाठी आलेल्या अहमदनगरच्या पाच भाविकांचा सोलापुरात अपघाती मृत्यू