सिंधुदुर्ग - प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयामध्ये उपोषणाला बसलेल्या सर्व नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तरीही प्रश्न न सुटल्यास प्रत्यक्ष भेटून परिस्थिती सांगा, नक्की प्रश्न मार्गी लावू असे, आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी उपोषणकर्त्या नागरिकांना दिले.
जिल्हा मुख्यालयातील जिल्हा विकास यंत्रणेच्या गाळ्यांमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. शिवभोजन थाळी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाची फीत कापण्याचा मान पालकमंत्र्यांनी बचतगटाच्या एका महिलेला दिला. या शिव भोजन थाळीतील पदार्थांचा आस्वादही त्यांनी घेतला.
हेही वाचा - राजपथावरही 'ती'चा आवाज , कॅप्टन तानिया शेरगील यांनी केले प्रजासत्ताकदिन संचलनाचे नेतृत्व
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेचा शुभारंभ करताना विशेष आनंद होत आहे. गरीब आणि गरजू लोकांसाठी ही एक चांगली योजना आहे. या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. भविष्यात राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. लोक कल्याणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच पुढे असतात. अशा लोक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री राज्यात सुरू करतील, असे सामंत म्हणाले.
यावेळी पालकमंत्री सामंत यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.