सिंधुदुर्ग - पूजा चव्हाण प्रकरणावर माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना 'विरोधी पक्षाने या प्रकरणात राजकारण करू नये. कारण, प्रश्न एका महिलेला न्याय देण्याचा आहे,' असे म्हटले आहे. तर, राठोड यांच्यावर यापूर्वी असे आरोप झालेले नाहीत, असे म्हणत त्यांची पाठराखण केली आहे. राणेविरुद्ध राऊत वादावर बोलताना 'एखाद्या व्यक्तीला रस्त्यात बदडवू म्हटल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली? त्यांच्यावर केस का नाही दाखल केली,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित उपस्थित केला आहे.
राठोड यांची केली पाठराखण
पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना, 'मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात संवेदनशील आहेत. त्यांनी याप्रकरणाची माहिती मागवली आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. या प्रकरणात नेमकी काय माहिती पुढे येतेय, हे बघावे लागेल. केवळ आरोपावरून कोणावर कारवाई करणे घाईचे आणि चुकीचे ठरेल. या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास मुख्यमंत्री स्वतः त्यावर निर्णय घेतील. कारण, हे प्रकरण एका कॅबिनेट मंत्र्यासंदर्भातले आहे. पूर्वी त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झालेले नाहीत,' अशा शब्दांत केसरकर यांनी राठोड यांची पाठराखण केली आहे. 'तशा प्रकारचे पुरावे समोर आल्यास मुख्यमंत्री निर्णय घेतील,' अशी प्रतिक्रिया या प्रकरणात त्यांनी दिली आहे.
राणे-राऊत वादात पोलिसांच्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित
राऊतविरुद्ध राणे प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'एखाद्या व्यक्तीला रस्त्यात बदडवू म्हटल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली? त्यांच्यावर केस का नाही दाखल केली,' असा प्रश्न उपस्थित केला आहे. 'सरळ सरळ जर कोणी रस्यात बदडवू म्हणत असेल, तर तो गुन्हा होतो, याची दखल घेऊन पोलिसांनी तेव्हाच त्यांना अटक केली असती तर, पुढचा प्रसंग आला नसता. अनिष्ट प्रवृत्तींना रस्त्यावर येऊन उत्तर द्यायचे नसते तर, कायद्याचा बडगा दाखवून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. गेल्या पाच वर्षात त्यांना त्यांची जागा दाखवली म्हणून या अनिष्ट शक्ती मान खाली घालून होत्या. मात्र, पुन्हा ह्या शक्ती आपले डोके वर काढत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर इलाज झाला पाहिजे,' असे ते म्हणाले.