सिंधुदुर्ग - यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता शेतकरी शेताकडे धाव घेऊ लागला आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील शेतकरी धूळ पेरण्यांना प्रारंभ करतो. यावर्षी वेळेत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज बांधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धुळ पेरण्यांना प्रारंभ केला आहे.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती सध्या जुगार ठरत असूनही शेतकऱ्यांना हा खेळ दरवर्षी मांडावा लागतोच. मान्सूनच्या आगमनापूर्वी 10 दिवस आधी पेरलेले बियाणे पाऊस आल्यानंतर उगवून येते. पाऊस येताच तयार झालेला हा भात तरवा शेतात लावला जातो. त्यामुळे शेतकरी वर्गात धुळ पेरण्यांना महत्त्व दिले जाते.
शेतीसाठी आधुनिक आणि संकरित शाश्वत उत्पन्न देणारे भातबियाणे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. संकरित भात बियाणे व घरची बियाणे अशा दोन्ही बियाणांचा सर्रास वापर शेतकरी करत आहे. मात्र, खरीप हंगामाच्या तयारीत मान्सूनपूर्व सरी पडल्यास ती धोक्याची घंटा ठरु शकते.