सिंधुदुर्ग - सचिन वाझेंना मनसूख हीरेन प्रकरणात अटक झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात एनआयए निपक्षपणे चौकशी करेल, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल, ते समोर येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शंभर अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एकाही निरपराधावर अन्याय होता कामा नये, याची काळजी एनआयए आणि एटीएस या दोन्ही टीम घेतील, अशी खात्री असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
विवेकबुद्धी जागृत ठेवून कारवाई आवश्यक -
सचिन वाझे यांचा 17 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने बळी दिला होता. त्याप्रमाणे त्याची पुनरावृत्ती आता होते आहे. असे त्यांचे स्वतःचे मत आहे. त्यामुळे नक्कीच यामधे काळबेर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनआयएने आपली सदसद् विवेकबुद्धी जागृत ठेवून याबाबत कारवाई करणे आवश्यक असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विनायक राऊत यांनी टीका केली आहे. अन्वय नाईक प्रकरण त्यावेळी ज्यापद्धतीने दाबले गेले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आपल्या जवळचा असेल त्याला संरक्षण द्यायचे आणि दुसऱ्यावर सत्तेचा दुरउपयोग करायचा, ही नीती सध्या भाजपा अवलंबत असल्याची टीक राऊत यांनी केली.
काय आहे सचिन वाझे प्रकरण -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा खाडीत मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या मृत्यूवरून राजकारण तापले आहे. हिरेन प्रकरणावरून केंद्र आणि राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. या वादाचा पहिला दणका मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांना बसला असून काल त्यांना एनआयएने अटकही केली आहे.
हेही वाचा - 'नवा ग्राहक संरक्षण कायदा चांगला; जिल्हा स्तरावर आर्थिक मर्यादा बदलण्याची गरज'