सिंधुदुर्ग - भारतीय सैन्य दल भरतीचा पाया मजबूत होण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी एन. सी. सी.मध्ये दाखल व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र बटालियनच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख ब्रिगेडियर आर. बी. डोगरा यांनी केले. त्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ शाळा व महाविद्यालयांमध्ये एन. सी. सी. ५८ महाराष्ट्र बटालियनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातही एन. सी. सी. ५८ महाराष्ट्र बटालियन सुरू करण्यात येणार असल्याचे डोगरा म्हणाले. गेल्या मार्च महिन्यात सिंधुदुर्गनगरीत कोल्हापूर विभागांतर्गत एन. सी. सी. ५८ महाराष्ट्र बटालियन युनिट सुरू करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार निकषांची पूर्तता करणाऱ्या १६ शाळा महाविद्यालयांमध्ये एन.सी.सी. ५८ महाराष्ट्र बटालियनचे युनिट सुरू करण्यात आले. याचा शुभारंभ बुधवारी ब्रिगेडियर आर. बी. डोगरा यांच्या हस्ते झाला.
एन.सी.सी. ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधुदुर्गचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट कर्नल सी. पी. उन्निकृष्णन, कर्नल देवेन भारव्दाज, सुभेदार संदीप कुमार, सुभेदार विनोद कुमार, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच युनिट्सचे शिक्षक उपस्थित होते.