सिंधुदुर्ग - जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या गावातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. त्यासाठी ग्रामपंचयातींनी ग्राम निधीमधून निधी खर्च करावा. ग्रामपंचयतींना हा निधी खर्च करताना अडचण निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाकडून तसे आदेश निर्गमीत करण्यात येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
तहसीलदार रमेश पवार, गट विकास अधिकारी एम.आर.भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतिश सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, संजय पडते, संदेश पारकर यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी व कणकवली तालुक्यातील सरपंच या बैठकीला उपस्थित होते.
प्रत्येक गावचे सरपंच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या बरोबरीने ग्रामस्तरावर आशा वर्कर्स, पार्ट टाईम मदतनीस, आंगणवाडी सेविका हेही कार्यरत आहे. त्यांचे योगदान मोठे आहे मात्र, त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. त्यांना प्रती महिना 500 रुपये मानधन वाढवून देण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
तलाठी, ग्रामसेवकांना ज्या गावात पदभार दिला आहे, त्या गावात वास्तव्यास असावे, असे आदेश तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी द्यावेत. तलाठ्यांनी त्यांचा जॉबचार्ट रोज सादर करावा, तसेच किमान दोन गावांना त्यांनी रोज भेट द्यावी. रात्री-अपरात्री गावात येणाऱ्या लोकांना यापुढे ग्राम समितीने ठरावकरून त्यांच्या गाव प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा. याबाबत प्रशासनालाही कळवण्यात यावे. ग्राम समितीने ठरवलेल्या कालावधीतच बाहेरील नागरिकांना गावात प्रवेश द्यावा. प्रवेश वेळेनंतर जे प्रवासी येतील त्यांची सोय तालुकास्तरावरील तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
सोशल मीडियावर सरपंचांची बदनामी करण्याऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. विना पास, फक्त टोकन घेऊन कोणी जिल्ह्यात प्रवेश करत असेल तर त्याला जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. काही लोक दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा कंटेन्मेंट झोन बाहेरील पत्ता देऊन पास काढून जिल्ह्यात येत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करताना पास सोबतच पासधारकाचे आधार कार्डही तपासण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.