सातारा - बिजवडी भागातील १६ गावांच्या पाणी प्रश्नाचे कोणीही राजकीय भांडवल करू नका, असे भावनिक आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केले. तेल गुरुवारी बिजवडीतील शिवसैनिकांच्या बैठकीत बोलत होते.
बिजवडी परिसरातील १६ गावे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याच योजनेत नाहीत. या गावांबरोबरच एकूण ३२ गावांचा पाणी प्रश्न कायम सुटण्यासाठी आजही केंद्र आणि राज्य शासनाच्या परवानग्या घेणे बाकी आहेत. मात्र, तरीही काही राजकीय मंडळी निवडणुका डोळ्यासमोर बैठकांचे आणि निधींचे कागदी घोडे नाचवत पाणी प्रश्नाचे भांडवल करत आहेत. त्यामुळे त्यांनी आता लोकांना फसवणे बंद करावे, असे भोसले म्हणाले.
बिजवडी आणि माण-खटावच्या पाणी प्रश्नासाठी आम्ही जेलभरो आंदोलन करत कळंबा जेलमध्ये गेलो. तसेच मुंबईतील आझाद मैदानात मंत्रालयासमोर धरणे आंदोलने केली. ११ दिवस उपोषण करुन पाणी प्रश्न कायम जागृत ठेवला. यावेळी सरकार व मुख्यमंत्री याबरोबरच आमदारही कोण होते आणि कोणाचे होते आणि मग याला इतकी वर्षे का लागली? हा प्रश्नदेखील का विचारू नये, असे म्हणत भोसले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आमच्याकडे देखील मंत्रालय स्तरावरील बैठकांचे अनेक वर्षांपासूनचे कागदी पुरावे आहेत. पण यामुळे तालुक्यात पाणी आले का? याचे खरे उत्तर नाही. भाबड्या आणि आशावादी जनतेला अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी पाण्याचे आमिष दाखवत निवडणूक काळात कायमच फसवत असतात, हे या दुष्काळी तालुक्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. बिजवडी भागातील गावांसाठी उपसा सिंचन योजना मंजूर केल्याच्या आरोळ्या ठोकणारे आणि कागदे फडकविणाऱ्यांना माझे आव्हान आहे, की जलआयोगाच्या लवादाची ५९९ टीमसी पाणी वाटपानंतरची आणि या योजनेसाठी लागणार्या वाढीव पाण्याची मंजुरी देखील दाखवावी. जनतेच्या भावनेचा या पुढे तरी खेळ खंडोबा करणे सर्व राजकीय मंडळींनी थांबवावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.