सातारा - जिल्ह्यात व ग्रामीण भागात खासगी सावकारीने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान नसल्याने सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असली तरी सावकारांची दुकानदारी मात्र, चांगलीच फोफावली असून, 'दुष्काळी' तालुक्यात सावकारांचा पैसा चांगलाच खळखळू लागला आहे. परिस्थितीमुळे अनेक शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत आहेत.
जमीनदार, छोटे-मोठे टपरीवाले, दुकानदार, सराफ व शासकीय कार्यालयात पांढऱ्या कपड्यात वावरणारे गावनेते, वाळू सम्राटांनी बेकायदा सावकारीची दुकाने उघडली आहेत. त्यांच्याकडून दरमहा दिवसाकाठी पठाणी वसुली होत आहे. पोलिसांशी असलेल्या आर्थिक सबंधामुळे व राजकीय दबावामुळे सावकारांनी गोरगरीब जनतेची मालमत्ता व्याजात वसुल केली आहे. सर्वसामान्य कुटुंबांना बेघर करून देशोधडीला लावल्याचे प्रकार सावकारीतून होत आहेत. या खासगी सावकारांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही.
दुष्काळी भागात सावकारांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला पैशाचा पुरवठा करून त्यांच्या मालमत्ता हडप करण्यात आल्या आहेत. वसुलीसाठी चक्क या सावकारांनी गुंडांच्या टोळ्याच नेमलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या खासगी सावकरांवर कोणते ही नियत्रंण नसल्याने ते मोकाटपणे शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.
शेतकरी वर्गाची अर्थवाहीनी समजली जाणाऱ्या भू-विकास बँकेसह अनेक बँका बुडाल्याने सहकाराला चांगलीच घरघर लागली आहे. त्यामुळे सावकारांची संख्या वाढली आहे. दुष्काळामुळे शेतकरी वर्ग नेहमीच कर्जबाजारी राहीला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या सातबारावरील पीक नोंदी प्रमाणे कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे दुष्काळी भागात बाजरी व ज्वारीसारख्या पिकांच्या नोंदी असतात. त्यामुळे कर्ज कमी मिळत असल्याने सर्वसामान्यांना खासगी सावकारांचे दरवाजे ठोठवावे लागतात. अशा वेळी जास्त रक्कम असेल तर सावकार जमीन नावावर करुन रक्कम व्याजासकट दिल्यानंतर जमीन परत देतो. मात्र, ते कर्ज चक्रव्याढ पध्दतीने वाढतच जाते. अन् हे आव्याकाच्या बाहेर गेल्याने शेवटी त्या जमीनी कवडीमोल रकमेवरच सावकार हडप करीत आहेत.