सातारा - वाई एमआयडीसीमधील इंडस्ट्रीजमध्ये नेमून दिलेले काम पसंत नसल्याने दोन कामगार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते. या दोन बेपत्ता कामगारांपैकी एकाचा मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळून आला. तर दुसऱ्याचा शोध वाई पोलीस घेत आहेत.
दुपारीच गेले होतो कामावरुन निघून -
वाई एमआयडीसीतील यश इंडस्ट्रीजमध्ये नरेश धर्मदासजी (वय २० रा.३२ ऐ इंदिरा झील सुल्तानपुरी नॉर्थ वेस्ट दिल्ली) आणि त्याचा मित्र बिरु श्रीपाल असे दोघेजण कामाला होते. पण इंडस्ट्रीजमध्ये नेमून दिलेले काम पसंत नसल्याने ते दोघेही दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते. संध्याकाळपर्यंत ते पुन्हा कंपनीत परत न आल्याचे कंपनीचे मॅनेजर रणजित बबन मंडले यांना सांगितले. त्यांनी सह कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बेपत्ता कामगारांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
धोम कालव्यात मृतदेह -
दोन्ही कामगार बेपत्ता असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यावेळी काही वेळातच कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा फोन आला की, रविवार पेठ, मोती बाग येथील धोम डाव्या कालव्यात एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आला होता. तो मृतदेह तक्रार दाखल केलेल्या बेपत्तापैकी एका मुलाचाच आहे. मॅनेजरने जाऊन पाहिले असता कामगार नरेश धर्मदासजी याचाच मृतदेह असल्याची खात्री झाली. पोलिसांनी मृतदेह कालव्यातून बाहेर काढुन त्याचा पंचनामा केला. वाईच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दुसरा अद्याप बेपत्ता -
अद्याप दुसऱ्या कामगार बिरुचा पोलीस शोधत घेत आहेत. रात्री अंधार पडल्याने ही शोध मोहिम थांबविण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार आर. झेड कोळी करीत आहेत.
हेही वाचा - पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट राजकीय तडजोडीसाठी का?, उदयनराजेंचा सवाल