महाबळेश्वर (सातारा) - पाचगणी हे पर्यटनस्थळ तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांसाठी खुली होत आहेत. सोमवारपासून पर्यटकांना निसर्गाबरोबरच खरेदीचा आनंद घेता येणार आहे. मात्र विविध पाँइटस् बंद राहणार असल्याने पर्यटकांना निवास, न्याहारी व जेवणाबरोबरच खरेदीचा आनंद घेता येईल.
तब्बल दोन महिन्यांची प्रतिक्षा
जिल्ह्यातील लाॅकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने जिल्हाबंदी उठली आहे. महाबळेश्वर-पाचगणी ही पर्यटनस्थळे तब्बल दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पाचगणीच्या दांडेघर नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांची रॅपिड अॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे. विकेंडचे दोन दिवस म्हणजे शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शिवाय सायंकाळी ५ नंतर जमावबंदी कायम असल्याने पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना लाॅजवर परतावे लागणार आहे. बाजारपेठही ५ नंतर बंदच राहणार आहे. उद्या (सोमवार) दोन महिन्यानंतर प्रथमच बाजारपेठ उघडणार आहे.
पर्यटकांचा हिरमोड
जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्याने काल (शनिवारी) सुमारे एक हजार पर्यटकांनी पाचगणी-महाबळेश्वरला भेट दिली. आज (रविवारी)ही तेवढेच पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र पर्यटनस्थळे बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
'राहता येईल पण...'
महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले आहे. मात्र महाबळेश्वर-पाचगणीतील सर्व पॉईंटवर, पर्यटनस्थळांवर फिरण्यास पर्यटकांना बंदी आहे. पर्यटकांना हॉटेलमध्ये राहता येईल. शहरातील रस्त्यांवर फिरता येईल. मात्र पॉईंटवर जाता येणार नाही, असे महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानाधारक दारू विक्रेत्यांना दिलासा