सातारा- कोरोना संकटाचा सामना करताना गोरगरीब, मजूर यांचे सार्वत्रिक हाल होत आहेत. प्रशासन, सामाजिक संघटना शक्यतोपरी मदत करत आहेत. परंतु, या मदतीत तांत्रिकदृष्ट्या वंचित रेशनकार्ड नसलेल्या लोकांचा आकडाही मोठा आहे. याच वंचितांना थेट मदत मिळावी यासाठीची माहिती प्रशासनाकडून घेतली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. बँकेच्या माध्यमातून मिळालेली ही मदत प्रशासन तालुक्यातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असे मत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या १० ठळक बातम्या; वाचा एका क्लिकवर..
कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा आज सर्वजणच मोठ्या धैर्याने सामना करत आहेत. या संकटात प्रशासनाच्या उपाययोजना व सर्वांनीच त्याला केलेले अभूतपूर्व सहकार्य यामुळेच येथे कोरोनाचा शिरकाव होवू शकला नाही. ही जमेची व तितकीच कौतुकाची बाब असल्याचेही विक्रमसिंह पाटणकर म्हणाले. पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब, मजूर अन्नधान्यापासून वंचित लोकांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अन्नधान्य मदत देण्यात आली. विक्रमसिंह पाटणकर यांच्या पुढाकारातून ही मदत आणली व ती प्रशासनाकडे सुपुर्त करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
पाटण तालुक्यातील नागरिकांनी, प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे व 'लॉकडाऊन'च्या नियमांचे पालन करुन कोरोनाचा प्रसार रोखला आहे. परंतु, या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील हाजारो मजूर, कामगारांचे रोजगार बंद झाले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांच्या कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गरजू लोकांना अजूनही मदत मिळालेली नाही. अशा लोकांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून व आमचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्याची मदत करण्यात आली आहे. पाटण प्रशासन ही मदत तत्काळ गरजुवंताना पोहोचवणार असल्याची माहिती सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिली.
कोरोनामुळे सर्वच स्तरातील लोक अडचणीत आले आहेत. अशा बिकट परिस्थितीत पाटणकर पिता-पुत्र मदतीचा हात पुढे करुन चांगले काम करत आहेत, असे मत जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले, नुकतेच सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण प्रशासनाला २ हजार बॉटल्स सँनिटायझरही उपलब्ध करुन दिले होते. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आतापर्यंत पाटण तालुक्यातील हाजारो लोकांना अन्नधान्याची मदत केली आहे. वैशिष्ट्य म्हणजे पाटणकर पिता-पुत्रांनी या मदतीची कोठेही जहिरातबाजी केलेली नाही. त्यांच्या मते हे लोक आमच्यासाठी कोणीही परके नाहीत ते आपलेच आहेत. फक्त आज या परिस्थितीमुळे ते हतबल झाले आहेत. अशा वेळी त्यांना सावरने, त्यांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, पाटण विधानसभा मतदारसंघातचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, जिल्हा बँक कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.