सातारा - परंपरेनुसार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायी दिंडीचे आज प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत निघालेल्या आषाढी वारी पायी दिंडी मिरवणुकीची सांगता मंदिरात करण्यात आली. वारकऱ्यांची कमी असली तरी मिरवणुकीत उत्साह कायम होता.
ब्रह्मचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी असल्याने गोंदवलेकर पायी दिंडीला विशेष महत्व आहे. पूर्वजांची वारीची परंपरा श्री महाराजांनीही सुरू ठेवली होती. त्यांच्या पश्चात समाधी मंदिर समिती, वारकरी मंडळ व ग्रामस्थांनी हा सोहळा अविरतपणे सुरू ठेवला आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. गोंदवल्यातील समाधी मंदिर देखील अद्याप बंदच आहे. त्यामुळे पायी आषाढी वारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान करण्याचे नियोजन मंदिर समिती व वारकरी मंडळाने केले होते.
त्यानुसार आज सकाळी आठ वाजता समाधी मंदिरात श्रींच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायकच्या जयघोषात दिंडीने मंदिरातून ग्राम प्रदक्षिणेसाठी प्रस्थान केले. यंदा श्रींच्या पादुका रथात स्थानापन्न न करता भाविकांच्या हातामध्ये विराजमान होत्या. हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात गावातील अप्पा महाराज समाधी, दत्त, शनी, खंडोबा, सिद्धनाथ, मारुती, श्रीराम मंदिरात क्रमाक्रमाने विसावला. त्यानंतर हा सोहळा पुन्हा समाधी मंदिरात आणून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. पंढरपूरकडे जाणारी पायी दिंडीची परंपरा या निमित्ताने आजही अखंडित ठेवण्यात आली.
दरम्यान, आज प्रातिनिधिक स्वरूपात श्रींच्या पायी दिंडीचे प्रस्थान झाले. मात्र, श्रींच्या पादुका समाधी मंदिरातील एका कक्षात विराजमान करण्यात आल्या असून आषाढी एकादशीपर्यंत याच ठिकाणी पादुकांची पूजा करण्यात येणार आहे. शासनाने परवानगी दिल्यास एकादशीच्या दिवशी काही भाविक या पादुका पंढरपुरात घेऊन जाणार असल्याची माहिती वारकरी मंडळाने दिली.