सातारा - जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. साताऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लक्ष घालावं, अशी मागणी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
आमदार भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्या सारख्या छोट्या जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिन्याभरापासून सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. आता उद्यापासून पुन्हा जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन असतानाही गेल्या महिन्याभरात रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही. त्यामुळे आता पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये येईल असं वाटत नाही. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये 1423, पुणे जिल्ह्यात 900, सोलापूर मध्ये 1536, सांगलीत 1126 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1774 च्या आसपास बाधित रुग्ण आढळून आले. आणि सातारा जिल्ह्यात तब्बल 2648 रुग्ण वाढले. साताऱ्यात होत असलेली ही रुग्ण वाढ चिंतेचा विषय आहे.
'लॉकडाऊन अंतिम उपाय नाही'
लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही, याचाच अर्थ कुठेतरी चूकत आहे. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे. त्यांनी तातडीने साताऱ्यात येऊन जिल्ह्यातील महामारीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
'कोरोना टेस्ट वाढवण्याची गरज'
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोक तसेच हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. लॉकडाऊन असाच सुरू राहिल्यास लोकांना उदरनिर्वाह करणे मुश्कील होईल. कोरोना टेस्टमध्ये वाढ करावी. ग्रामीण भागात सर्वत्र कोरोना टेस्ट कीट उपलब्ध करून द्याव्येत. कोरोनाबाधितांचा शोध घ्यावा, त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असं देखील भोसले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - सोलापूर : सांगोला तालुक्यात अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा