कोल्हापूर - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर कडे पायी निघालेले सात वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे. या अपघातात सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात पंढरपूर मिरज महामार्गावर सांगोला तालुक्यातील जुनोनी गावा जवळ घडला आहे. ( Six died in the accident ) घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मृतांची नावे पुढील प्रमाणे -
- शारदा आनंदा घोडके 61 वर्ष
- सुशीला पवार
- रंजना बळवंत जाधव
- गौरव पवार 14 वर्ष
- सर्जेराव श्रीपती जाधव
- सुनिता सुभाष काटे
- शांताबाई शिवाजी जाधव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने धडक दिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा भावना मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केल्या आहेत. तसेच, मृत वारकरी बांधवांच्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमी वारकरी बांधवांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. असही ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी केले ट्विट - सांगोला-मिरज मार्गावर एका दुर्दैवी अपघातात कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणार्या काही वारकर्यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत असही ते म्हणाले आहेत.