सांगली - कडेगाव येथील ज्येष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे ह्रदय विकाराने बुधवारी निधन झाले आहे. ते 73 वर्षाचे होते. देशमुखे हे कडेगाव - खानापूर तालुका साहित्य परिषदेचे संस्थापक होते. अंध कवींच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
साहित्यिकांसाठी असायचे नेहमी पाठबळ -
कडेगाव येथील संवेदनशील व्यक्तिमत्त्व व धान्याचे प्रसिद्ध व्यापारी आणि कवी चंद्रकांत देशमुखे उर्फ बाबूजी यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. बालपणापासून अंध व शिक्षणाचा कसलाही गंध नसलेले देशमुख यांनी आपल्या कवितेतून देशभक्ती रुजविण्याचे त्यांचे काम गेली ५७ वर्षे अविरतपणे सुरू होते. देशमुखे हे कडेगाव - खानापूर तालुका साहित्य परिषदेचे संस्थापक - सदस्य तसेच विद्यमान खजिनदार म्हणून कार्यरत होते. परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ वाढीसाठी विविध साहित्यिक कार्यक्रम राबवून मोठे बळ देशमुखे यांनी दिले होते. जिल्ह्यातील साहित्यिकांनाही त्यांचे पाठबळ राहिले होते.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात सादर केल्या कविता -
सांगली जिल्ह्यातील साहित्य चळवळीला बळ देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. हातकणंगले येथे झालेल्या अखिल भारतीय अंध-अपंग साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या होत्या.
श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित -
विट्याच्या रेणावीचा श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हेही वाचा - आमदार फंडातून सांगली रुग्णालयासाठी तीन व्हेंटिलेटर सुपूर्द