सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' हे अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत सांगली पोलीस आणि राज्य परिवहन (एसटी) आगारातर्फे 'नो मास्क, नो सवारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात विना मास्क प्रवाशांना वाहनामध्ये प्रवेश मिळणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव व समूह संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्यासाठी सांगली पोलीस आणि एसटी विभागाकडून 'नो मास्क,नो सवारी' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बसबरोबरच रिक्षा, वडाप यामधून प्रवास करणाऱ्याला मास्क सक्तीचा असणार आहे. ज्यांच्याकडे मास्क नाही, त्या प्रवाशाला गाडीत प्रवेश दिला जाणार नाही, अशा पद्धतीची ही मोहीम राबवली जाणार आहे. आजपासून (मंगळवार) 'नो मास्क, नो सवारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सांगलीच्या एसटी विभागाच्या विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर आणि सांगली पोलीस वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. सांगली शहरात धावणाऱ्या बस, त्याचबरोबर रिक्षा यांच्या माध्यमातून या मोहिमेबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. मास्क नसतानाही गाडीत प्रवेश दिला गेल्याचे आढळले तर संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी या मोहिमेला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी सांगली पोलिसांकडूनही करण्यात आले आहे.