सांगली - पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरू झालेला आष्टा येथील केळी सौद्याचा बाजार, केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी आधार देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आष्टा येथील केळी सौद्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जयंत पाटलांच्या हस्ते केळ्यांचे सौदे
केळी उत्पादक शेतकरयांनी स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा उपबाजार समिती आवारात "केळी सौदे"सुरू करण्यात आले आहेत. सांगली कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये पंढरपूर वगळता केळी सौद्याचा बाजार कुठेही नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळ्यांचा दर मिळण्यामध्ये मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते, ही बाब लक्षात घेऊन इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात केळी सौदे सुरू करण्यात आलेले आहेत. राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी सौद्याचा शुभारंभ पार पडला आहे.
केळी बाजार शेतकऱ्यांना ठरणार आधार
या सौद्याच्या निमित्ताने 30 टन केळीची आवक झाली होती तर खरेदीसाठी सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातून व्यापाऱ्यांनी हजरी लावली होती. यावेळी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडलेल्या पाहिल्याच सौद्यात एकवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. यावेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. त्या ठिकाणी केळी सौद्याचा बाजार आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात केळी सौद्यांचा बाजार कोठे नव्हता. पण, आष्टा या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या बाजार हा शेतकरी व व्यापाऱ्यांना आधार देणारा ठरणार आहे, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरणात शुक्लांची चौकशी करावी - जयंत पाटील