सांगली - विटा शहरात टोळीयुद्धामध्ये एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना आज मंगळवारी (दि. 24 डिसें.) शहरातील यशवंतर नगर परिसरात घडली. शहरातील अत्यंत शांत समजल्या जाणाऱ्या परिसरात भरदिवसा रस्त्यावर तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, दांडक्यांच्या वापराने टोळीयुद्ध झाले. यात तरूणांचा रस्त्यावर फरफटत मारहाण करून खून झाला.
अजय राजेंद्र बसागरे ( वय - 21 वर्षे, रा. आयटीआयजवळ, साळशिंगे रोड, विटा) याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला कराडला उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र श्रीकांत बालाजी मुघलवाड (वय 18 वर्षे, रा. कदमवाडा, विटा) हा देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या खूनी हल्ल्याप्रकरणी आकाश पवार, विजय काळोखे, सागर गायकवाड (तिघेही रा. विटा) या तिघांना रात्री उशिरा विटा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांसह नवनाथ काटकर, सागर गायकवाड, अजय काळोखे, दत्ता साबळे, शिवतेज माने यांच्यासह अनोळखी चार जणांविरोधात विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत, पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, यशवंतनगर येथील साळशिंगे रोडवरील विटा मर्चंट्स बँकेजवळ आरफा नाष्टा सेंटरमध्ये आज मंगळवारी (दि. 24 डिसेंबर) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अजय बसागरे हा त्याचा मित्र श्रीकांत मुघलवाड याच्यासमवेत नाष्टा करत बसला होता. त्यावेळी अचानक एका पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओतून हातात तलवार, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडकी अशी धारदार शस्त्रे घेतलेले दहा ते बारा युवक उतरले. काही क्षणातच त्यांनी नाष्टा सेंटरमध्ये घुसून अजय व श्रीकांत या दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हॉटेलमधील इतर ग्राहक, मालक आणि रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, स्थानिक रहिवासी भयभीत झाले. हल्लेखोरांनी अजय आणि श्रीकांत या दोघांनाही फरफटत रस्त्याच्या मधोमध आणून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला.
या हल्ल्यात अजयच्या डोक्याला जबर मार लागल्याने खोलवर जखम झाली. तर श्रीकांत हा देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला आहे. हल्लेखारांकडे असणारी धारदार शस्त्रे आणि हल्लेखोरांचा आवेश पाहून मदतीसाठी कुणीही धाडस करत नव्हते. मात्र, त्या दोघांचा बचावासाठी आरडाओरडा सुरू होता. दरम्यान, हाकेच्या अंतरावर असणार्या खरेदी-विक्री संघात जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर, मंथन मेटकरी व प्रकाश बागल यांना आरडाओरडा ऐकू आला. त्यामुळे ते त्याठिकाणी आले. परंतु, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. तातडीने बाबर यांनी आपल्या गाडीतून दोन्ही जखमींना ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या अजय बसागरे व श्रीकांत मुघलवाड यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यावरच रक्ताचा थारोळा पडला होता.