रत्नागिरी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदम यांनी फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सांगत होते की, मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन...पण ते आलेच नाहीत आणि त्यामुळे ते आता फ्रस्टेड झाले आहेत, असे म्हणत रामदास कदम यांनी फडणवीसांचा समाचार घेतला.
सरकारला बदनाम कसं करता येईल आणि आपल्याला पुन्हा बसता येईल का? हा एवढा बालिश प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दापोलीत प्रसारमाध्यांशी बोलताना केली. आमदार योगेश कदम गेल्या 10 दिवसापासून मतदारसंघात तळ ठोकून नुकसानग्रस्त लोकांना आवश्यक ते अन्नधान्य, कौले व आदी मदत करत आहेत. आता 5 हजार चादरी वाटप करण्यात येणार असल्याचे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, नामदार उदय सामंत, आमदार योगेश कदम आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.