रत्नागिरी - आधीच कोरोनामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. त्यात आता वादळामुळे मच्छिमारांचे नुकसान झालं आहे. बोटींचे नुकसान, जाळी फाटली आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी राज्य सरकारला वेगळा विचार करायला सांगणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. आज शरद पवार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी मच्छिमारांनी आपल्या व्यथा पवारांसमोर मांडल्या. त्यावेळी त्यांना आश्वस्त करताना शरद पवार बोलत होते.
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली तालुक्याला बसला. हजारो घरे या वादळात उद्ध्वस्त झाली आहेत. नारळी, पोफळी, आंब्याच्या बागा या वादळात जमिनदोस्त झाल्या आहेत. विजेचे पोल ठिकठिकाणी पडले आहेत. शेकडो कोटींचं नुकसान या वादळात झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासनाने तातडीची 75 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, नुकसानीचा आकडा मोठा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त कोकणची पाहणी करण्यासाठी मंगळवारपासून कोकण दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पवार आज (बुधवार) रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. सकाळी मंडणगडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास गावातील नुकसानीची पाहणी केली. वेळासमधील जवळपास प्रत्येक घराला या वादळाचा फटका बसला आहे. कुणाच्या घरावर झाड पडले आहे, तर कुणाच्या घराचे छप्पर उडाले. त्यामुळे धान्य, कपडे, घरातील इतर सामान यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे पोल पडल्याने वीज नाही, या सर्व व्यस्था ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याजवळ मांडल्या. सरकारने आम्हाला उभं करण्यासाठी जास्तीत जास्त मदत द्यावी, अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी पवार यांच्यासमोर व्यक्त केल्या.नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मदतीचे निकष बदलण्यासाठी राज्य सरकारला आग्रह करणार असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. यावेळी पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जि. प. अध्यक्ष रोहन बने, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.