रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी जी काही मुक्ताफळे उधळली, ती अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांना फटकारले. ते आज रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले
यावेळी तटकरे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळावेळी निकषांच्या पलीकडे जाऊन कोकणवासीयांना मदत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी देखील राज्य सरकारने कोकणाला झुकते माप देत सहकार्याने मदत करावी, अशी ठाम भूमिका माझी राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
विरोधकांवर टीका
तटकरे म्हणाले की, संकटाच्या काळात सर्व एक होत असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटाचा मुकाबला सामुदायिकरित्या करायचा असतो, राजकारण करायचे, त्यावेळी करता येईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या संदर्भात जी काही मुक्ताफळे उधळली गेली, ती अत्यंत दुर्दैवी आहेत. यापेक्षा अधिक मी काही बोलू इच्छित नाही. या संकटाच्या काळात टीका टिप्पणी करण्यापेक्षा कोकणवासीयांच्या पदरी काय अधिक पडेल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
भाजप नेत्यांनी आपले राजकीय वजन केंद्रातून मदत आणण्यासाठी वापरावे
पंतप्रधानांनी गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदत केली, आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की, भारत सरकारने जे काही पॅकेज जाहीर केले, ते पॅकेज जसेच्या तसे तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्व राज्यांना लागू केले पाहिजे. एनडीआरएफच्या निकषांमध्ये वाढ केली पाहिजे. दरम्यान, आता जे काही विरोधक टीका करत आहेत त्यांचे सरकार केंद्रात असल्यामुळे आपल्या राजकीय वजनाचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यावा, अशी आपली त्यांना विनंती असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली टीका निराधार
भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्य सचिव अजय मेहता यांच्यावरून मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका निराधार आहे. असे काही विसंगत बोलून प्रसिद्धी मिळवण्याच्या पाठीमागे जाऊ नका, अशी त्यांना आपली विनंती असल्याचे तटकरे म्हणाले.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी 450 पॉझिटिव्ह रुग्ण, 36 जणांच्या मृत्यूची नोंद