रत्नागिरी - जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, आता जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
धरण भरल्यामुळे प्रकल्प अभियंता निकिता हजारे यांच्या हस्ते धरणातील पाण्याची पुजा देखील करण्यात आली. पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणाची साठवण क्षमता १२६.१५ मीटर असून पाणी पातळी १२०.५५ मीटर एवढी आहे. सध्या धरणात एकूण ६४.८८ दसलक्षघनमीटर पाणीसाठा असून, त्यातील ६४.५६ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. धरण भरल्याने सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गडनदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या ४८ तासात मुंबई व तळकोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.