रत्नागिरी - काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर सध्या सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, बांदिवडेकरांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप नेटिझन्सकडून केला जात आहे.
याच मुद्द्यावरून बांदिवडेकर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
- 'काँग्रेसचा उमेदवार सनातनचा समर्थक? जरा तरी लाज बाळगा
- वैभव राऊत या अतिरेक्याला मित्र मानणारा हा माणूस सिंधुदुर्गातून उभा राहणार, आणि काँग्रेसकडे आल्याने तो सेक्युलर म्हणून आपण त्याला मते देणार? हे अजिबात पटणारं नाही
- निषेध...निषेध... काँग्रेसने बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द केली पाहिजे, अशा शब्दांत नेटिझन्सनी बांदिवडेकर यांना ट्रोल केले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर अशाच एका पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'काँग्रेस आत्महत्त्या करायला निघाली आहे. यापुढे पाठिंबा नाही.
'तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे समर्थन करणार नसाल तर तुम्ही भाजपचे समर्थक' हे मिथक रूजवून आमच्या सारख्यांना काँग्रेसचे समर्थन करायला भाग पाडणाऱ्या पुरोगामी मित्रांना माझा दंडवत'
त्यामुळे एकूणच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.