रत्नागिरी - खेड तालुक्यातील फुरुस-फळसोंडे येथील जंगलात ७ अजगर मारून एकाच ठिकाणी पुरल्याचे समोर आले होते. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वनविभागाने ४ जणांना अटक केली आहे. जितेंद्र मिसाळ (फुरूस, फलसोडा), तज्जमुल परकार (फुरूस गावठान), सलीम महाडिक (फूरूस, फळसोडा), सुनील पाटील (फुरुस) अशी या आरोपींची नावे आहेत.
शनिवारी २ फेब्रुवारीला सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये फुरुस-फळसोंडे-पोयनार या मार्गावरील जंगलमय भागात ७ अजगर मारल्याचे दिसत होते. ही घटना गंभीर असल्याने, वनपाल अनिल दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलात शोध सुरु केला असता, त्यांना जंगलात एका ठिकाणी ७ अजगर पुरल्याचे आढळून आले. यामध्ये २ मादी आणि ५ नरांचा समावेश होता. हा प्रकार गंभीर असल्याने दळवी यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.
त्यानुसार चिपळूण येथील विभागीय वनाधिकारी विजयराय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील मोबाईल स्कॉडचे कांबळे, खवटीचे वनरक्षक आर. आर. शिंदे, दापोलीचे सुरेश वरक, बानतिवरेचे वनरक्षक एम.जी. पाटील, आंबवलीचे वनरक्षक एम. डी. पाटील व तळे येथील वनरक्षक दुंडगे हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर गाडण्यात आलेल्या सातही मृत अजगरांना बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी बांबू आणि दगडही आढळून आल्याने या अजगरांना ठेचून मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
त्यानंतर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून वनविभागाकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज (सोमवारी) सकाळी दापोली वनविभागाने ४ जणांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या चौघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.