रायगड - नुकतीच झालेली निवडणूक, दिवाळीची सुट्टी व भाऊबीज असल्याने मुंबईसह उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमान्यांनी पर्यटनासाठी अलिबाग, मुरुड, गोवा, कोकण, महाबळेश्वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली आहे. एसटीसह खासगी गाड्यांनी हे चाकरमानी, पर्यटक निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे चाकरमानी, पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत.
जिल्हा प्रशासन व वाहतूक शाखेच्या नियोजनाचाही अभाव असल्याने वाहतूक कोंडी दूर करणे त्रासदायक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली वाहने, पुढे वाहने काढण्याच्या प्रयत्नात रस्ता अडवणे, रस्त्यावर वाहने बंद पडली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील गडब ते वडखळ आणि पेण ते तरणखोप या ठिकाणांहून वाहनांच्या जवळ-जवळ 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबल्याने एकतर्फी महामार्गावरून वाहने चालवणे मोठे जिकीरीचे बनले होते. अनेक ठिकाणी छोटी वाहने पुढे काढण्याच्या नादात वाहतूक कोंडीत भर पडत होती. वाहतूक पोलिसांची तुरळक यंत्रणा रस्त्यावर असली तरी नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली. दैनंदिन प्रवास करणारी एस. टी.ची सेवा, अवजड माल वाहतूक करणारी वाहने यांची भरीस भर पडली आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली अनेक वर्षे धिम्यागतीने सुरू असलेले मुंबई- गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीही वाहन चालक व प्रवाशांकडून होत आहे.