पेण (रायगड) - महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेण तालुक्याने आता विकास कामांत गती ( Pen Rural Roads ) घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांना देखील एक नवीन साज चढू लागला आहे. ग्रामीण रस्ते चकाचक झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. हे रस्ते करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांवर पेणमधील सरपंच व प्रवाश्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खड्डेमुक्त झाले रस्ते - रस्ते विकासाचे ध्येय असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात विविध रस्ते विकासाची कामे होत आहे. आता पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुद्धा चकाचक होऊ लागलेत. अनेक वर्षे खड्डेमय असलेले पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मागील काही वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते. रस्त्यांवरील खड्डे आणि खचलेल्या रस्त्यांनी ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली होती. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था बघून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रा.मो. गोसावी, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे, पेण उपविभागीय अभियंता डी.एम.पाटील यांनी पेण तालुक्यातील रस्त्यांची फक्त दुरुस्तीच नाही तर निधी उपलब्ध करून थेट नवे रस्ते तयार करण्याचा चंग बांधला. यावेळी त्यांना साथ मिळाली ती रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांची.
चिखलमुक्त प्रवास - पेण तालुक्यातील वाशी, वढाव, काळेश्री, हमरापूर, दादर, वशेणी, निगडे, पाबळ, वाकरूळ, वरवणे आदी रस्ते उत्कृष्ठ पद्धतीने तयार केले. मुसळधार पावसासाठी ओळख असलेल्या कोकणातील ह्याच रस्त्यांवर येणाऱ्या पावसाळ्यात प्रवाश्यांना चिखलमुक्त प्रवास करायला मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले यांचा प्रवास या रस्त्यावरून सुखकर होणार आहे.
हेही वाचा - राज ठाकरे यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल - बाळा नांदगावकर