रायगड - जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुढील कार्यकाळासाठी अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. यावेळी 4 पैकी कुठल्या महिलेच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यानिमित्ताने रायगडचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल एवढं मात्र नक्की. मात्र, या आरक्षणामुळे अॅड. निलीमा पाटील यांचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे.
हेही वाचा - राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर
2017 मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ठरल्याप्रमाणे शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना अध्यक्षपद दिले. त्यावेळी नाराज पेणच्या निलीमा पाटील यांना पुढील अध्यक्षपद देण्याची घोषणा शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळीच केली होती. आता आदिती तटकरे यांचा कार्यकाळ संपला आहे. नवीन अध्यक्षपदासाठी आज मुंबईत सोडत काढण्यात आली. आजच्या आरक्षणाकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. यात चक्रानुक्रमे अनुसूचित जमाती महिलेसाठी रायगड जिल्हा परीषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे.
शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीतील निर्णयानुसार पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीला अध्यक्षपद तर पुढची अडीच वर्षे शेकापला असा फॉर्म्युला ठरला. राष्ट्रवादीचा कार्यकाळ संपला आता शेकापचा सुरू झाला आहे. अॅड. आस्वाद पाटील यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद आले आहे. मात्र, आजच्या आरक्षण सोडतीने रायगडमधील राजकीय समीकरणेच बिघडवून टाकली आहेत. प्रथम म्हणजे निलीमा पाटील यांना हे अध्यक्षपद देण्याचे शेकाप नेतृत्वाने मान्य केले होते. परंतु, आता निलीमा पाटील यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. दुसरे म्हणजे विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापचा पार धुव्वा उडाला.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी चार डिसेंबरला
जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे अध्यक्षपदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्याचा आणि त्यासाठी सुशिक्षित चांगली प्रतिमा असलेल्या प्रभावी कार्यकर्त्यांकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद शेकापला देता येणार नाही. त्यामुळे याचा शेकापला फटका बसण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जमाती असे आरक्षण पडेल असा अंदाज सर्वांनाच होता. परंतु, ते महिलेसाठी राखीव असेल याचा अंदाज कुणालाच नव्हता. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष कोण? याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्षपदासाठी शेकापकडे दोन (योगिता पारधी, पदी ठाकरे पनवेल ), शिवसेनेकडे एक (सहारा कोळंबे, कर्जत) आणि काँग्रेसकडे एक (अनुसया पादीर, कर्जत) अशी नावे आहेत. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसची रायगड जिल्हा परिषदेत युती आहे. त्यामुळे अध्यक्षपद शेकापकडे जाईल आणि योगिता पारधी किंवा पदी ठाकरे यांच्या गळयात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे.
असे असले तरी राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलताना दिसताहेत. अशावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवीन युतीची समीकरणे जुळतील का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, असे काही होण्याची शक्यता फार धूसर आहे.