पेण-रायगड : समाजोद्धारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत आहे. अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठका सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही त्यांनी सुरू आहे.
सामाजिक उपक्रम राबविले : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात प्रतिष्ठानने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे.
स्वच्छतादूत म्हणूनही धर्माधिकारी यांची ओळख : आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ, पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर : या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून सुरू केली होती. आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच त्याचे कुटुंब करीत आहेत. यावेळी पेणचे आमदार रवींद्र पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र भोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजोद्धारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.