रायगड - गणेश चतुर्थी 2 सप्टेंबरला असल्याने चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यास निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी नसली तरी खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावलेली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना खड्ड्याच्या रस्त्यानेच जावे लागत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात आहेत.
हेही वाचा - गणपती बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न; पालघर परिसरात रस्त्यांची दुरवस्था
गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असल्याने कोकणात जाणारे चाकरमानी गावी जाण्यास निघाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखकारक प्रवास करण्यास मिळावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे ठेकेदाराना भरण्यास सांगितले होते. ठेकेदारामार्फत पडलेले खड्डे भरले गेले आहेत. पेण ते वडखळ दरम्यान काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मात्र, पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पेव्हर ब्लॉकही वाहनांच्या रहदारीने दबले गेले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर खड्डे आहेत.
हेही वाचा - यंदा लालबागचा राजा अंतराळात; 'हे' दृश्य बघून तुम्हालाही वाटेल अभिमान
चाकरमानी कोकणात जाण्यास निघाले असल्याने वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात असून अनेक ठिकाणी बाह्य वळण देऊन वाहतूक फिरविण्यात आलेली आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी नसली तरी खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे.