पनवेल - आपल्या संस्कृतीत तुळशीला खूप महत्व आहे. कार्तिकी एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात झाली. हार व फुलांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासमोर पाटावर ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती, तुळशी आणि पाट यांच्यामध्ये धरलेला अंतरपाट, मंगलाष्टकांचा सुरू असलेला मंगलमय गजर, अशा वातावरणात तुळशीविवाह साजरा करण्याची परंपरा असते. पण, याही पुढे जाऊन तुळशीच्या रोपांचं घरोघरी जाऊन वाटप करून पनवेलच्या कळंबोलीत अनोख्या पद्धतीने तुळशीविवाह साजरा करण्यात आला.
हेही वाचा - LIVE : राज्याची वाटचाल महा'शिव'आघाडीकडे; सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग
साई प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या अनोख्या तुळशीविवाहाचं अनेक स्तरातून कौतूक करण्यात येत आहे. शास्त्रीत तुळशीचे असाधारण महत्त्व व पर्यावरण रक्षणासाठी असलेला उपयोग हा सर्वांनाच माहिती आहे. तुळशीला आपल्या घरातील कन्या मानून विष्णुसोबत थाटामाटात विवाह लावून कन्यादानाचे सुख मिळवतात. याच परंपरेच्या चौकटीत न राहत तुळशीचे दान करण्यापेक्षा ती आपल्या घरात ठेवली तर तिच्या रूपातून ती घरात २४ तास ऑक्सिजनचा पुरवठा करेल आणि घरात आरोग्यदायी वातावरण तयार होईल, असा विचार करून नितीन काळे यांनी जवळजवळ 350 घरात तुळशीचे वाटप करून अनोखा तुळशीविवाह साजरा केला.
साई प्रतिष्टानचे नितीन काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राबवत असलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे आम्हाला तुळशीचे महत्त्व उमगले. त्यामुळे त्यांनी दिलेली सर्व तुळशीची झाडे जगवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. इतकंच काय तर गेल्या वर्षी त्यांनी वाटप केलेले तुळशीचं रोप आज फुलून मोठं झालंय. यातून पर्यावरण संवर्धन होईल, प्रत्येक घरासमोर तुळस दिसलीच पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू, नागरिकांचीही तशीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया येथील महिलांनी दिली.
या उपक्रमाबद्दल शहरातील नागरिकांनी तसेच विशेष करुन महिला वर्गाकडून साई प्रतिष्टानच्या या अभिनव उपक्रमाबद्दल तसेच पर्यावरणकामी तुळशीचे असलेले महत्त्व नागरिकांसमोर मांडल्याबद्दल कौतूक होत आहे.