रायगड - खालापूर तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात सुपिक आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भातशेती पिकवली जाते. परंतु, यावर्षी येथील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. पहिल्या पावसात भाताचे पिकही वाहून गेले आहे. दुबार लागवडी केल्यानंतरही शेतकऱ्यांवर हे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
भाताची दुबार लागवड
भाताची दुबार लागवड केल्यानंतर काही दिवस पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. परंतु, भाताचे पिक चांगले बहरले असतानाच, पावासाने पाठ फिरवली. त्यामुळे भाताचे हिरेवागार पिक कोलमडले. परंतु, पावसाने पुन्हा चांगली बरसात केली. त्यामुळे काही ठिकाणी भाताची दुबार लागवड करण्यात आली. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून अतिवृष्टीच्या पावसाने अनेक भागाला झोडपून काढले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका भात शेतीला बसला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे भाताचे रोप पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
शेती व्यवसाय संकटात
खालापूर तालुक्यात औद्योगिक नगरी मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही, भात शेती पिकावर बहुतांश शेतकरी अवलंबुन आहेत. येथील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांवर दुबार लागवडीचे संकट कोसळले आहे. दुबार लागवडीनंतर काही दिवस चांगल्या पध्दतीने पाऊस पडल्याने भाताचे शिवार बहरले होते. मात्र, काही दिवस पाऊस गायब झाल्याने भाताचे पिक कोरडे पडले होते. मोठा खर्च करून भाताची लागवड करावी लागते. त्याच्या रोपापासून लागवडी पर्यंतचा खर्च खूप असतो. मात्र, पावसाने एका फटक्यात होत्याचे नव्हते झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला मदत करावी, अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत.