रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी ६०० कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. मात्र, 5 वर्षांत भाजप सरकारने यापैकी फक्त ६० कोटी निधी दिला होता. मात्र, आता महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रायगड किल्यावर रखडलेली कामांना आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य राजधानी रायगड किल्ल्यास निधी मंजूर केल्याने समस्त शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आभार मानले. तसेच आनंदाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित निधीही लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला पसंती दिली होती. रायगड किल्ल्यावरून महाराजांनी स्वराज्याचा गाडा सांभाळला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला हा शिवभक्तांचे आराद्य दैवत आहे. रायगड किल्ल्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी 2014 मध्ये राज्य सरकारने रायगड प्राधिकरण स्थापन करून किल्ला संवर्धनाचे काम हाती घेतले. या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे असून त्यांच्या देखरेकीखाली रायगड किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी फडणवीस सरकारने ६०० कोटी रुपये मंजूर केले. प्राधिकारणातून रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटी निधीपैकी फक्त ६० कोटी निधी पाच वर्षात राज्य सरकारने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे वर्ग केले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाकडून एक रुपयाचाही निधी वर्ग केलेला नव्हता. त्यामुळे अनेक कामे ही निधी अभावी रखडलेली होती.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी २० कोटी निधी कॅबिनेट बैठकीत मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ला संवर्धन कामासाठी दिलेल्या निधीमुळे रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. आगामी काळातही रायगड किल्ला संवर्धन कामासाठी लवकर निधी मिळण्याची आशा शिवभक्त आणि शिवसैनिकामध्ये निर्माण झालेली आहे.
रायगड किल्ला प्राधिकरणाअंतर्गत आलेल्या ६० कोटी रुपये निधीच्या माध्यमातून किल्ल्यावरील कामांना सुरुवात केली. किल्ल्यावरील तटबंदी, दरवाजे, पायऱ्या, गडावरील घरेही पूर्वी सारखीच दिसावी या पद्धतीने काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी किल्यावर पुरातत्त्व विभागाकडून खोदकाम करण्यात आले असून अजून खोदकाम सुरू आहे. चित्त दरवाजा ते महा दरवाजापर्यंत दगडी पायऱ्यांचे काम पूर्ण होत आलेले आहे. किल्ल्यावरील पाण्याची सोय व्हावी यासाठी महाराजांनी बांधलेली 84 टाक्यांमधील गाळ काढण्यात आलेला आहे.
गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिणाच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची कामे प्रगती पथावर आहेत. रोपवे ते नगारखानापर्यंत पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. जगदिश्वेर आणि वाडेश्वर मंदिराचे केमिकल केंजुरेशन काम पूर्ण झाले आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या 21 गावच्या रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. महादरवाजा ते शिरकाई मंदिर येथील पादचारी रस्त्याची कामे, महादरवाजा तटबंदी, मनोरे, जगदीश्वर मंदिर पादचारी रस्ता या कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे विशेष नियुक्त अभियंता शिवाजी सातपुते यांनी सांगितले.
मंजूर केलेल्या निधीपैकी १० टक्केही निधी देण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले होते. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी २० कोटी मंजूर केले. त्यामुळे आगामी काळात किल्याच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही, अशी आशा शिवभक्तांना निर्माण झाली आहे.