खालापूर (रायगड) - तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत असल्यामुळे शेती कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. यामुळे महड येथील शेतकरी मोरेश्वर अनंत कोशे यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजने अंतर्गत भात लागवड यंत्र व त्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
मजूर, वेळ व खर्चात बचत
यंत्राच्या साह्याने भात लागवड केल्यामुळे मजूर, वेळ व खर्चात बचत होते असते. त्यामुळे या वर्षी खरीप हंगामात तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भात लागवड यंत्राद्वारे भात लागवडी करिता खालापूर तालुक्यातील १० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे क्षेत्र विस्तार करण्याची नियोजन करण्यात आलेले आहे. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना झूम ॲप द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असून यंत्राद्वारे लागवड करू इच्छीत असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच ग्रुपवर शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीकरिता याचे मार्गदर्शन वेळोवेळी दिले जात आहे.
या कारणांमुळेही भात लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे
कृषी खात्यांच्या माध्यमातून भाताचे पीक वाढविण्यासाठी शेतकरी वर्गांस सातत्याने सहकार्य केले जात आहे. भात पीक लागवडीचे क्षेत्र वरचेवर कमी होत असताना, मात्र भात लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्या कारणांमुळेही भात लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. यामुळे यंत्राद्वारे भात लागवड करुन चटई रोपवाटिका तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. यामुळे राब लवकर तयार होत असून लागवड ही लवकर होत असते. शिवाय यंत्राच्या साहाय्याने शेती लागवड केल्यामुळे अनाठायी खर्चाला लगाम बसत आहे.