रायगड - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांच्याकडे आज विधी व न्याय या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर झालेल्या मंत्रिपदाच्या खातेवाटपात तटकरे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या खात्यांच्या जबाबदारी देण्यात आली होती.
त्यानंतर आज आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले आहे. मुख्यमंत्र्यांकडील माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय या 2 महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रिपद तटकरे यांच्याकडे देण्यात आल्याने आता त्यांच्याकडे राज्यामंत्रिपदाच्या एकूण 8 विभागाचा पदभार आला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील युवा मंत्री म्हणून तटकरे यांनी आपल्या कार्यशैलीची छाप मुख्यमंत्र्यांवर सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.