रायगड - कोरोनाचे संकट गडद होत असताना पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 331 गाव, वाड्यातील 62 हजार 479 नागरिक पाणी टंचाईमुळे तहानलेले आहेत. या नागरिकांना 33 टँकर आणि 4 विहिरीमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई सुरू होते. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी नऊ कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच कोरोनामुळे अनेक चाकरमानी हे गावाकडे आल्याने पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होत असला, तरी रोजच्या दैनंदिन कामासाठी पाण्याचा तुटवडा नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासाठी नागरिकांना अतिरिक्त पाण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. एकीकडे कोरोनाने नागरिक भीतीच्या छायेत असताना पाणीटंचाईची समस्या सोडविताना नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जिल्ह्यात 331 गाव वाड्यावरील 62 हजार 469 नागरिक हे तहानलेले आहेत. पावसाळा सुरू होण्यास अजून महिना बाकी असून तोपर्यंत या नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासन जरी टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असला तरी गावागावातील पाणीटंचाई समस्या सोडविण्यात अजूनही अपयशी ठरले आहे.