पुणे - आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक कोठून लढवणार हे अद्याप ठरलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. राजकारण हे विकासासाठी झाले पाहिजे आणि याच उद्देशाने आपण नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. हाच उद्देश ठेवून आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे दिपाली सय्यद म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.
सध्या विविध राजकीय पक्षांकडून राज्यात यात्रा काढल्या जात आहेत. यात्रा काढत असताना यात्रेच्या माध्यमातून जनतेला नेमके काय मिळाले हे देखील त्यांनी जनतेला सांगावे. 'माय अर्थ फाउंडेशन' आणि 'दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट' च्या वतीने प्लास्टिक विरोधात अभियान सुरू करण्यात आले आहे. याची सुरुवात सोमवारी पुण्यातून करण्यात आली. नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्या घेऊन त्या बदल्यात कापडी पिशव्या देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. नागरिकांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी हा प्रयत्न असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले.