पुणे - कोरोनामुळे यंदा सर्वच सणवार शांततेत साजरे केले जात आहेत. दरवर्षी पुण्यामधील मंडईतील साखरे महाराज मठात तुळशी विवाह सोहळा मोठ्या तयारीत आणि उत्साहात साजरा होतो. यंदा मात्र हा सोहळा साधेपणाने पार पडला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुळशीविवाह सोहळा आयोजित केला होता. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कार्यकर्ते व महिला तसेच साखरे महाराज मठाचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले. या कार्यक्रमाचे यंदा ३८वे वर्ष होते.
तुळशी विवाह साधेपणाने साजरा
ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने म्हणाले, भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करणे. प्रबोधिनी एकादशीपासून पूजोत्सव करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.
मूर्तीचे पूजन व औक्षण
दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे साखरे महाराज मठात मूर्ती आणण्यात आली. मंदिराबाहेर मूर्तीचे पूजन व औक्षण करण्यात आले. रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्यांनी रस्ता सुशोभित करण्यात आला होता. मठात झालेल्या विवाहसोहळ्याला पुणेकरांनी पारंपरिक वेशात हजेरी लावली.
हेही वाचा - कंगनाला मिळणार नुकसानभरपाई; कार्यालयावरील तोडक कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका