पुणे : अंधारात पळून जायला हिंमत लागत नाही. तुम्ही सुरत, गुवाहाटीला पळून गेलात. शिवसैनिक पळपुटा नसतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे लोक पळपुटे असू शकत नाहीत. त्यामुळे हे विधान अतिशोक्तीपूर्ण वाटते. त्या विधानांमध्ये फार तथ्य वाटत नाही. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्र अनावरणाचा कार्यक्रम विधानभवनामध्ये पार पडला. भाषणामध्ये मुख्यमंत्र्यानी धैर्य, ताकद लागते असे म्हटले. ती मी बाळासाहेबांकडून घेतली असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांचा शिवसैनिक पळपुटा नसतो, तुम्ही अंधारात पळून गेलात असे म्हणत निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण : शिवसेना वंचित युतीवर बोलताना मी प्रकाश आंबेडकर यांना भेटेल त्यांनी जरी या अगोदर मला ओळखत नाही असे म्हटले तर बिघडले कुठे? संधी समजून आम्ही काम करत राहू असे म्हणत त्यांनी शिवसेना वंचित युतीवरसुद्धा प्रतिक्रिया दिली. भीमशक्ती, शिवशक्ती असे प्रयोग पूर्वीही झालेले आहेत. रामदास आठवले यांना घेऊन हा प्रयोग झालेला आहे, असे त्या म्हणाल्या.
सर्वांचे एकमेकांवर आरोप : राज ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यावर ढिगाने आरोप केले. देवेंद्र फडवणीस यांनी नारायण राणेंवरती खूप मोठ्या प्रमाणात आरोप, टीका केली. नारायण राणे यांनीही तेच केले. या लोकांनी एकमेकांच्या अगदी उखाळ्या पाखळ्या काढल्या. नंतर हे लोक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले. माझे आणि प्रकाश आंबेडकरांचे नाते तणावाचे नाही किंवा आरोप आणि प्रत्यारोप याचेही नाही. त्यांच्यासोबत मला काम करायला काही प्रॉब्लेम कारण नाही. ते ओळख नाही म्हणाले पण बिघडले कुठे असे म्हणू शकतो असेही त्या पुढे म्हणाल्या.
तैल चित्र अनावरण कार्यक्रमावर टीका : तैल चित्राच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित नसल्याबद्दल टीका होत असताना सुषमा अंधारे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. संध्याकाळी एक प्रोग्राम आहे तर सकाळी किंवा दुपारी तुमचा प्रोग्राम घेता आला असता. आम्ही संध्याकाळी येतोय दुपारी तैलचित्राचा कार्यक्रम घ्या असे करता आले असते. हा कार्यक्रम दुपारीही करता येऊ शकला असता. पण जाणीवपूर्वक गैरसोईची वेळ ठेवण्यात आली.
राज ठाकरे हे पोस्टमन : राज ठाकरे हे पोस्टमन आहेत असे सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हटले आहे. पोस्टमनगिरी करणाऱ्या लोकांबद्दल न बोललेले बरे. यांनी सांगितले की पत्र लिहिणार, त्यांनी सांगितले की पत्र लिहायचे. कोणीतरी स्क्रिप्ट दिली की तीन वर्षानंतर म्हणायचे. या लोकांवर काही फार मला व्यक्त व्हावेसे वाटत नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. तीन वर्षानंतर असे म्हणताना दुसरे कोणी हृदयसम्राट म्हणून उभे केलेले होते का? वेडेपणा आहे हा सगळा, असे मत अंधारे यांनी यावेळी व्यक्त केले.
शुभांगी पाटील यांना पाठिंबा : शिवसेना अत्यंत ठामपणे उभी राहते. शिवसेनेने नाशिकच्या शिक्षक मतदार संघामध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. अशा भूमिका आम्ही अनेकवेळा घेतलेल्या आहेत. राहिला प्रश्न कसबा विधानसभा मतदारसंघ, पिंपरी चिंचवड मतदार संघ,या मतदार संघामधल्या भाजपचे उमेदवार जरी ते भाजपचे असले तरी सुद्धा अकाली निधन या लोकांचे झालेले आहे. त्यांचा कार्यकाल शिल्लक राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेताना संवेदनशीलता जपायला हवी. सगळ्याच बाजूंचा सगळ्या शक्यतांचा विचार करत, पक्षप्रमुख एक परिपक्व निर्णय नक्कीच घेतील असे त्या म्हणाल्या.